शिरूर रावडेवाडी (टाकळीहाजी) ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने पराग साखर कारखान्याची २४ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील 'पराग ॲग्रो फूड्स अँड अलाईड प्रॉडक्ट्स' या साखर कारखान्याला ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून तब्बल २४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चाळीसगाव (जि. जळगाव) येथील तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुल रामदास भाकरे (वय ३६, रा. माळवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर नितीन तुळशीराम चव्हाण आणि ज्ञानेश्वर गबरू राठोड (सर्व राहणार घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जुलै २०२५ रोजी रावडेवाडी येथील कारखान्याच्या परिसरात घडली. आरोपींनी संगनमत करून कारखान्याला ऊसतोड मजूर पुरवतो, असे खोटे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यासाठी आरोपींनी रीतसर लेखी करारही केला होता.परंतु मजूर पुरवण्याच्या नावाखाली आरोपींनी खालीलप्रमाणे रकमा आपल्या बँक खात्यावर घेतल्या:गोरख भारमल राठोड: ८ लाख १८ हजार रुपये,नितीन तुळशीराम चव्हाण: ४ लाख ८६ हजार रुपये ज्ञानेश्वर गबरू राठोड: ११ लाख ३४ हजार रुपयेअशी तिघांनी एकूण २४ लाख ३८ हजार रुपये कारखान्याकडून घेतले. मात्र, पैसे घेऊनही करारानुसार मजूर न पुरवता कारखान्याची आणि प्रशासनाची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुल भाकरे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून
या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी गोरख भारमल राठोड, नितीन तुळशीराम चव्हाण आणि ज्ञानेश्वर गबरू राठोड (सर्व राहणार घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६ (२), ३१८ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहे.

