शिरूर प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी व दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न तातडीने सोडवावेत या मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शिरुर प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने दि २४ जुलै २०२५ रोजी कारेगाव येथील यश इन चौकात पुणे-नगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल वाळके यांनी केले. यावेळी दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. आंदोलकांनी तहसीलदार येईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता. मात्र, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांशी चर्चा केली व निवेदन स्विकारले. तसेच सदर मागण्या शासन स्तरावर पाठवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा महिलाध्यक्ष अनिता कदम, महिला जिल्हा उपाध्यक्ष उज्वला गाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, पुणे जिल्हा संघटक भास्कर गवारे, शिरुर तालुकाध्यक्ष नारायण नवले, महिला तालुकाध्यक्ष ज्योती हिवरे, माया फलके, संभाजी नवले, मनेश सोनवणे, दत्तात्रय तरटे, यांच्यासह शेकडो दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार सहभागी झाले होते. अंदाजे ८० ते १०० कार्यकर्ते उपस्थित होते.
रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती खबरदारी घेत आंदोलन शांततेत पार पडले. या आंदोलनानंतर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. यावेळी शिरुर आणि शिक्रापुर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थि
त होते.