शिरूरमध्ये उत्साहात पार पडली किल्ले स्पर्धा : नव्या पिढीत गडकिल्ल्यांप्रती प्रेम निर्माण होणे काळाची गरज – अभिजीत पाचर्णे
मातोश्री प्रतिष्ठान आयोजित किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात
शिरूर प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात मुलांना आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि गडकिल्ल्यांची ओळख करून देणे गरजेचे आहे. यासाठी अशा किल्ले स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत शिरूर नगरपरिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती अभिजीत पाचर्णे यांनी व्यक्त केले.
मातोश्री कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 2024 च्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे व श्रीकृष्ण उद्योग समूहाचे उद्योजक सागर नरवडे उपस्थित होते.
यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर, पत्रकार सतीश धुमाळ, मुकुंद ढोबळे, शैलेश जाधव, सतीश केदारी, प्रमोद वाघचौरे, साजिद शेख, किरण आप्रे आदी मान्यवर आणि स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सागर नरवडे यांनी बोलताना सांगितले की, “गडकिल्ल्यांविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या या स्पर्धेचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. सोशल मीडियाच्या युगात मुलांनी आपल्या इतिहासाशी नाळ जोडणे अत्यंत आवश्यक असून, अशा उपक्रमांना श्रीकृष्ण उद्योग समूह सतत पाठिंबा देत राहील.”
स्पर्धेमध्ये ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून पुढील विजेते निवडण्यात आले:
🔹 प्रथम क्रमांक – युवा संघर्ष गणेश मंडळ, मुंबई बाजार
🔹 द्वितीय क्रमांक – सायेशा आढाव
🔹 तृतीय क्रमांक – काव्या बाफना
🔹 चतुर्थ क्रमांक – सिद्धांत मुथा
🔹 पंचम क्रमांक – सिद्धार्थ पठारे
🔹 षष्ठम क्रमांक – श्रुती डहाळे
प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. स्वागत शैलेश जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन सतीश धुमाळ यांनी केले. आभार सतीश केदारी यांनी मानले.