भयंकर! पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

9 Star News
0

 भयंकर! पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला 



शिरूर प्रतिनिधी 

       पुण्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेले आहेत. दुर्दैवाने या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

     

नेमकं काय घडलं?

आज रविवार असल्यामुळे शाळा, खासगी आणि शासकीय कार्यालये यांना सुट्टी असते त्यामुळे कुंडमाळा या पर्यटणस्थळाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक जात होते. या ठिकाणाला भेट देण्याआधी इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडावा लागतो. या पुलावर मोठा पूल बसवण्यात आलेला होता. मात्र अचानकपणे हा पूल कोसळला आणि पुलावरून जाणारे 20 ते 25 पर्यटक थेट धो-धो वाहणाऱ्या नदीत वाहून गेले.


पूल झाला होता ओव्हरवेट

हा पूल बराच जुना आहे. असे असताना पुलावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा पूल कोसळला तेव्हा त्यावरून एकूण 50 पर्यटक जात होते. त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने हा पूल क्षणात तुटला आणि त्यावरून जाणारे पर्यटक थेट नदीत कोसळले.


पुलावरून नेल्या दुचाकी, हवेत हालत होता पूल

मिळालेल्या माहितीनुसार हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता. असे असताना त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त होती. त्यात भर म्हणून या पुलावरून जड असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या. हा पूल हवेतही हालत होता, असे सांगितले जात आहे. या सर्व गोष्टींमुळे हा पूल अचानकपणे कोसळला आणि ही दुर्दैवी घटना घडली आहे. वाहून गेलेले सर्व प्रवासी सुखरुप असावेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.


युद्धपातळीवर केलं जातंय बचावकार्य

दरम्यान, सध्या बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. तसेच या ठिकाणी एकूण 18 रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. स्थानिक लोकही जमेल त्या मार्गाने बचावकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलीसही घटनास्थळी जाऊन पोहोचले आहेत. नदीत वाहून गेलेल्यांचा शोध घेणे चालू आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    रोहित पवार काय म्हणाले....

यावेळी रोहित पवार म्हणाले, आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत कशी मिळेल असा आहे. जे लोक अडकलेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नदीपात्रात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


रोहित पवार यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मावळमध्ये (पुणे) कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहाहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं तर २० ते २५ जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. गुजरातमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात २७० जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेतून आपण सावरत नाही तोच मन सुन्न करणारी ही दुसरी दुर्घटना घडली. वाहून गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असावेत आणि सुखरुप परतावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना! मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

      सुप्रिया सुळे यांची भेट 

सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक अद्याप बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. "या ठिकाणी किती पर्यटक होते, कोणते लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधा, त्यांना तातडीने मदत पोहोचवा," असे निर्देश सुळे यांनी प्रशासनाला दिले. या अपघातानंतर अनेक कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांची घालमेल वाढली असून, त्यांच्याशी सुळे यांनी थेट संवाद साधत धीर दिला.

    

आदित्य ठाकरे काय म्हणाले 

युवासेना चे आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत; हिच ईश्वर चरणी प्रार्थना!”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.


       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले 

पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय या दुर्घटनेतून आतापर्यंत ६ जणांचा वाचवण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटनेत ३२ लोक जखमी झालेत, त्यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

     

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!