विवाहसोहळ्यात सर्वधर्म समभावाचा अनोखा संदेश; कारेगाव येथील शेख कुटुंबीयांचे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण
शिरूर प्रतिनिधी
कारेगाव (ता. शिरूर) येथील समाजसेवेत अग्रेसर असलेल्या दिलावर शेख यांच्या कन्या मुस्कान हिचा विवाह पारनेर तालुक्यातील अहिल्यानगर (रायतळे) येथील सलीम मोहम्मद शेख यांच्याशी रांजणगाव गणपती येथील सुखकर्ता लॉन्समध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या विवाहसोहळ्याने सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण केला.
वधूपिता दिलावर शेख यांनी माणुसकी आणि धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण घालून दिले. लग्न एकादशीच्या मुहूर्तावर असल्यामुळे संपूर्ण जेवण शाकाहारी ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे वारकरी बांधवांसाठी फराळाचा मेनूही समाविष्ट करण्यात आला होता. ही संवेदनशीलता अनेकांच्या मनाला भावून गेली.
याव्यतिरिक्त, लग्नसमारंभात होणाऱ्या सत्कार सोहळ्यावर खर्च न करता, संबंधित रक्कम गावातील ग्रामदैवत कारेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर, फलकेमळा येथील खंडोबा मंदिर आणि चांदशावली बाबा दर्गा व मंदिर यांना देणगी म्हणून अर्पण करण्यात आली. या निर्णयामुळे शेख कुटुंबीयांनी सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश दिला आहे.
या विवाहाच्या निमित्ताने एक जुनी आठवणही गावकऱ्यांच्या मनात जागी झाली. कारेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणाच्या वेळेस, मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेली दिलावर शेख यांची पानटपरी अडथळा ठरत होती. आर्थिक मदतीचे साधन असूनही, गावाच्या हितासाठी त्यांनी ती टपरी स्वतःहून हटवली होती. हा त्याग गावकऱ्यांना आजही आठवतो.
या अनोख्या उपक्रमाबद्दल शेख कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी एक आदर्श समाजासमोर मांडला आहे.
"आपण माणूस म्हणून जगणे हेच खरे धर्माचे पालन आहे. समाजाने आपल्याला भरभरून दिलं, त्याचे ऋण फेडण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे."
दिलावर शेख, कारेगाव