शिरूर ( प्रतिनिधी ) शिरूर तालुक्यातील सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असल्याने ओढे, नाले तुडुंब वाहत असताना काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले असून अनेक ठिकाणी रस्ते पूल वाहून गेल्याचे घटना घडल्या असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा आता शेतीपिकांचे पंचनामे करून मदतीची मागणी करीत आहे.
पिंपळे जगताप ता. शिरुर येथील गावातून जाणाऱ्या ओढ्याला पूर येऊन ओढा तुडुंब वाहत असताना येथील सोंडेकर मळा येथून जाणारा पिंपळे जगताप ते कोरेगाव भीमा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे हाल होऊ लागल्याने येथील नागरिक रस्त्यावर उतरले यावेळी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अक्षय सोंडेकर, विनोद सोंडेकर, ऋत्विक सोंडेकर, कार्तिक सोंडेकर, सोमेश्वर सोंडेकर, विलास सोंडेकर यांनी भर ओढ्याच्या पाण्यात उतरुन रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी ओढ्यातून पलीकडे सोडण्यासाठी मोठी कसरत केल्याने, येथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशी व वाहन चालकांना ग्रामस्थांचा आधार मिळाला आहे, तर यावेळी बोलताना या भागातील ओढा व रस्त्याची परिपूर्ण माहिती असल्याने आणि एखादी दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही नागरिकांना मदतीचा हात दिल्याने भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अक्षय सोंडेकर यांनी सांगितले.
जातेगाव खुर्द ता. शिरूर व जातेगाव बुद्रुक या शिरूर तालुक्यातील दोन गावांच्या मध्य भागातून वेळ नदी वाहत असून, चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन वेळ नदीला पूर आला आहे, तर जातेगाव बुद्रुक येथील दोन गावांना जोडणारा वेळ नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे, सध्या पूणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे कासारी फाटा, वाबळेवाडी, जातेगाव बुद्रुक मार्गे शिक्रापूर चाकण रोड रस्त्याला सोडणारा हा मुख्य रस्ता मानला जात असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ दिसून येत असते, मात्र वेळ नदीला अचानक आलेल्या पुरामुळे फुल पाण्याखाली गेल्याने अनेक वाटचाल करणे मोठी कसरत करावी लागत आहे, तर याबाबत बोलताना येथील फुलाची उंची कमी असल्याने दुर्दैवाने काही दुर्घटना घडत असतात मात्र दुर्घटना रोखण्यासाठी व अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी येथे लक्ष ठेवत आम्ही तत्पर असल्याचे आपचा मित्र वैभव निकाळजे यांनी सांगितले.
शिक्रापूर ता. शिरुर परिसरासह तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, धानोरे, दरेकरवडी, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, घोलापवडी, दहिवडी, पारोडी, कोंढापुरी, निमगाव म्हाळुंगी येथे गेल्या चार दिवसांपासून संततधार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मे महिन्यातच श्रावण धारा बरसू लागल्या असल्यामुळे सर्वत्र पाणी पातळीत वाढ होण्यास या पावसाचा निश्चितच लाभ होणार आहे. मात्र शेतकऱ्यांची खरिपाची मशागत सुरू होण्यापूर्वीच पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवस रात्र संततधार पाऊस पडू लागला त्यामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसामुळे सखल भागात तसेच शेतात पाणी साचले आहे. तर रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. पावसामुळे कांही वेळ वीजपुरवठा पूर्णता खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कांहीं ठिकाणीं ओढे वाहू लागले आहेत. तर या पावसामुळे काही उभ्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. मात्र या पावसाचा शेतीच्या मशागतीसाठी तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी मदत होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून संततधार पावसाने शेतकरी देखील हवालदिल झाले आहे.