सणसवाडीत अखेर भलेमोठे होर्डिंग कोसळलेच
दुर्घटना टाळण्यासाठी सर्व प्रशासणाची कार्यवाही गरजेची
शिरूर ( प्रतिनिधी )
प्रत्येक वर्षी पावसाळा सुरु होताना होणाऱ्या वादळामुळे अनेक ठिकाणचे फ्लेक्स कोसळून अनेक दुर्घटना घडण्याचे प्रकार घडत असताना यापूर्वी काही वृत्त प्रसारित झालेले होते अन अखेर तीन दिवसातच पुणे नगर महामार्गावर सणसवाडी येथे येत होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हजारो ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स उभारण्यात आलेले असून त्या ठिकाणी नेहमी अनेक कार्यक्रमांचे फ्लेक्स लावले जात असल्याने विद्रुपीकरण देखील मोठ्या प्रमाणात होऊन अनेक दुर्घटना घडत असताना प्रशासनाने वेळीच दाखल घेणे गरजेचे असल्याबाबत बोलले जात होते, तर आज नुकतेच पावसाचे आगमन झाल्यानंतर सणसवाडी येथे ऐन पुणे नगर महामार्गालगी वर्दळीच्या ठिकाणी चौकट होर्डिंग कोसळले, यावेळी त्याखाली आठ दुचाक्या चिरडल्या जाऊन दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने येथे कोणी व्यक्ती उभी नव्हती आणि पाऊस येत असल्याने सर्व नागरिक आजूबाजूला निवाऱ्यासाठी उभे राहिले असल्याने मोठी हानी टळली गेली, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत विस्काळलेली वाहतूक कोंडी सुरळीत करत क्रेनच्या सहाय्याने पडलेले होर्डिंग बाजूला घेतले, मात्र आलेल्या पावसामुळे नागरिक बाजूला उभे असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे, तर आय यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायत व संबधित विभागाला लेखी नोटीस देऊन होर्डिंग हटवण्यासाठी सांगणारे पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार कि एखादी मोठी दुर्घटना घडल्याची वाट पाहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र चौकट १ –
अतिक्रमण विभाग गेले कोठे . . . . . . .
पुणे नगर महामार्गावर एका महिन्यापूर्वी पुणे महानगर प्रादेशिक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्याचे कडेला असलेले सर्व पत्रा शेड, टपऱ्या अतिक्रमण म्हणून काढले मात्र त्याचे पुढे रस्त्याला अडथळा ठरणारे तसेच धोकादायक होर्डिंग तसेच ठेवले होते यामुळे आता या दुर्घटनेनंतर आता अतिक्रमण विभाग गेले कोठे असा सवाल नागरिक करत आहे.
स्वतंत्र चौकट २ –
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मागील आठवड्यात पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत यांना पत्र देऊन परिसरातील सर्व धोकादायक, अवैध्य फ्लेक्स काढून टाकण्याबाबत सुचना दिल्या असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.