पुणे ते शिरुर अतिजलद प्रवासासाठी द्यावा लागणार टोल
४५ मिनिटात होणार प्रवास ; पाच वर्षात रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन ; बीओटी तत्वाचा वापर
शिरूर प्रतिनिधी (मुकुंद ढोबळे)
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (एमएसआयडीसी) पुणे ते छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्प आणि सध्याच्या पुणे ते छत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे ते शिरुर उन्नत रस्त्याचे बांधकाम बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सध्या सुरू असून दीड ते दोन महिन्यात निविदा प्रक्रिया अंतिम करून आठ महिन्यात कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
अंदाजे २०३० मध्ये हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे. हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर पुणे ते शिरूर अंतर ४५ मिनिटात पार करता येणार आहे. या अतिजलद प्रवासासाठी वाहनचालकांना टोल द्यावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालय २००८ पथकर धोरण लागू करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पुणे ते छत्रपती संभाजी नगर प्रवास अतिजलद करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधण्यासह सध्याच्या पुणे तेछत्रपती संभाजी नगर महामार्ग सुधारणा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला होता. मात्र गेल्या वर्षी हा प्रकल्प एमएसआयडीसीकडे देण्यात आला आहे. त्यानुसार शीघ्रसंचार महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात ५४ किमी लांबीचा पुणे ते शिरुर उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या बांधकामासाठी एमएसआयडीसीकडून काही महिन्यांपूर्वी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सहा मार्गिकेच्या आणि ७५१५ कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठीच्या निविदा १ एप्रिलला खुल्या करण्यात येणार होत्या. मात्र आता या निविदेस महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.
हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरीत करा तत्वावर राबविण्यात येत असून या प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी या महामार्गावर टोल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रस्त्यासाठी राज्य सरकारचे पथकर धोरण लागू होत असल्याने भविष्यात हलक्या वाहनांसह अन्य काही वाहनांना पथकर लागू होणार नव्हता. त्यामुळे एमएसआयडीसीने पुणे – छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाला केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्रालय २००८ पथकर धोरण लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार नुकताच हा प्रस्ताव मान्य करून या महामार्गाला केंद्राचे पथकर धोरण लागू करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुणे ते शिरुर उन्नत रस्ता आणि शिरुर ते छत्रपती संभाजी नगर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग खुला झाल्यास सर्व प्रकारच्या वाहनांना टोल द्यावा लागणार आहे.
पुणे ते शिरुर उन्नत रस्ता प्रकल्पाच्या निविदेत आता बदल करून महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर निविदा खुल्या करून त्या अंतिम करण्याचे एमएसआयडीसीचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी किमान आठ महिन्यांचा कालावधी लागेल. हा उन्नत रस्ता २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.