इनामगाव ( ता. शिरूर ) येथे शेततळ्यात पोहताना बुडत असलेल्या पाच लहान मुलांचे प्राण येथील जीवावर उदार होऊन उपसरपंच सूरज मचाले यांनी वाचवले. मचाले यांच्या या धाडसी कामगिरीचे इनामगाव व परिसरामध्ये कौतुक केले जात आहे.
इनामगाव मधील पाच लहान मुले पोहण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडू लागली होती. परंतु दैव बलवत्तर म्हणून यावेळी त्या ठिकाणी इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले हे शेततळ्याशेजारी असलेल्या बोअरवेलमधील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेततळ्यात मुले बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या जिवाची पर्वा न करता शेततळ्यात बुडत असलेल्या या पाचही मुलांना बाहेर काढले.
इनामगावातील एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात शिवराज मनोहर कांगुणे,
पृथ्वीराज रविंद्र खरात, गौरव किरण खरात, ओंकार किरण खरात, सक्षम नवनाथ खरात ही पाच मुले काल शनिवारी दिनांक १५ जून रोजी दुपारच्या वेळेत पोहण्यासाठी गेली होती. तळ्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व या मुलांपैकी कोणालाही पोहता येत नसल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले. शेजारीच असलेल्या बोअरवेलची मोटर बंद करण्यासाठी आलेले इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यामुळे या सर्व मुलांचा जीव वाचला अन्यथा याठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती. परंतु सूरज मचाले यांनी दाखवलेले धाडस व समयसूचकता यांमुळे वरील पाचही मुलांचे प्राण वाचले. त्यांच्या या कामगिरीचे शिरूर तालुक्यासह जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.