शिरूरमध्ये अपघातांना आळा घालण्यासाठी न्हावराफाटा सतरा कमानी पुलाजवळ सौर ऊर्जा सिग्नल यंत्रणा कार्यान्वित
शिरूर, प्रतिनिधी
शिरूर शहरातील न्हावरा फाटा चौक आणि सतरा कमान चौक येथे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आयएफबी कंपनी व शिरूर पोलिसांनी सौर ऊर्जेवर चालणारी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर याठिकाणी सातत्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
यावेळी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे,आयएफबी कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी काशिराम मेस्त्री यांच्या हस्ते या सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कंपनीचे आयएफबी कंपनीचे संतोष निंबाळकर , प्रवीण बांदल , कुणाल परदेशी , वाहतूक पोलीस राजेंद्र वाघमोडे , शेखर झाडबुके , ज्ञानदेव गोरे , विकी मैड , नरेंद्र सुंभे , भाग्यश्री जाधव , गणेश देशमाने उपस्थित होते .
शिरूर शहरातील न्हावरा फाटा चौक हा अपघातांचे केंद्र बनला होता. आहिल्यानगर बाजूकडून येणारी अवजड वाहतूक न्हावरे मार्गे चौफुला येथील सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात जात असते. आहिल्यानगर मार्गे येणाऱ्या रस्त्याला उतार असल्यामुळे वाहने वेगाने येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी न्हावरा फाटा चौक आणि रोड क्रॉसिंग एकाच ठिकाणी असल्याने चालकांना अंदाज येत नसे, ज्यामुळे अनेक अपघात घडले.त्यचप्रमाणे, सतरा कमान चौक येथेही परिस्थिती वेगळी नव्हती. पुणे बाजूकडून येणाऱ्या रस्त्याला तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग वाढतो. रात्रीच्या वेळी चौकाचा किंवा रोड क्रॉसिंगचा अंदाज देणारे कोणतेही सूचना फलक नसल्यामुळे या ठिकाणीही वारंवार अपघात होत होते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. अपघातांचे प्रमाण कसे कमी करता येईल, याबाबत त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना चौकाचा अंदाज येण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी करडे, ता. शिरूर येथील आयएफबी कंपनीचे एचआर हेड काशीराम मेस्त्री यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या माध्यमातून न्हावरा फाटा चौक आणि सतरा कमान चौक या दोन्ही ठिकाणी आज प्रत्येकी दोन असे एकूण चार सौर ऊर्जेवर चालणारे सिग्नल यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत.
या सिग्नल यंत्रणेमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना चौकाची स्पष्ट कल्पना येईल आणि वाहनांचा वेग नियंत्रित करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. भविष्यात या सिग्नल यंत्रणेचा फायदा सर्व वाहनचालकांना होऊन अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन.