शिरूरमध्ये ‘तिरंगा पदयात्रा’; ऑपरेशन सिंदूरला नागरिकांचा पाठिंबा
शिरूर (प्रतिनिधी)
समस्त राष्ट्रभक्त शिरूर व पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने शिरूर शहरातून ‘तिरंगा पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर केलेल्या प्रतिहल्ल्याच्या समर्थनार्थ ही पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेमध्ये शेकडो युवक, महिलांबरोबर माजी सैनिक, विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेत "भारत माता की जय", "वंदे मातरम", "पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पावसाच्या सरी झेलत या पदयात्रेने शिरूर शहरातून जोशात प्रस्थान ठेवले.
पदयात्रेची सुरुवात बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ही पदयात्रा पुणे–अहिल्यानगर महामार्गावरून हुतात्मा स्मारक चौकात पोहोचली. येथे भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने शहीद जवानांना व पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या २८ पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, अॅड. मदन फराटे, माजी पंचायत समिती सदस्य भगवान शेळके, एकनाथ शेलार, दिलीप हिंगे, राजाभाऊ मांढरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, प्रिया बिरादार, नाना पोटे, गणपतराव फराटे, माजी सैनिक महादेव घावटे, मेजर नामदेवराव घावटे, अजित डोंगरे,विजय नर्के, उमेश शेळके, सागर नरवडे, हर्षद ओस्तवाल, कैलास सोनवणे, अविनाश जाधव, मितेश गादिया आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माजी कॅप्टन प्रभाकर थेउरकर यांनी “ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ते फक्त स्थगित आहे. जर युद्ध अधिक तीव्र झाले असते, तर पाकिस्तान पूर्णपणे उध्वस्त झाला असता,” असे प्रतिपादन केले. राष्ट्रपतींचे माजी अंगरक्षक व माजी सैनिक विठ्ठल वराळ यांनी भारत-पाकिस्तान-चीन दरम्यान झालेल्या युद्धांचा आढावा देत भारतीय सैन्याच्या सडेतोड कारवाईचे वर्णन केले.
अॅड. धर्मेंद्र खांडरे म्हणाले, “भारतीय सैन्याने अवघ्या ९० मिनिटांत पाकिस्तानला धडा शिकवला. भारत आता दहशतवाद्यांना कोठेही असेल तिथे निष्कारण सोडत नाही, हा संदेश या कारवाईतून गेला आहे.”
तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने मोठा विजय मिळवला आहे. जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.”