जिवंत सातबारा मोहिमे” अंतर्गत शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वारस नोंदणीसाठी विशेष मोहीम; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
शिरूर, प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि मा. जिल्हाधिकारी, पुणे व मा. उपविभागीय अधिकारी, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात “जिवंत सातबारा मोहीम” राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मयत झालेल्या खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.
दिनांक १ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत चावडी वाचनाद्वारे न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार, ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२५ दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) स्थानिक चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह वारस ठरवणार असून, २१ एप्रिल ते १० मे २०२५ दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे फेरफार तयार करून मंडळ अधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत. परिणामी, सर्व जिवंत वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येणार आहे.
शिरूर तालुक्यातील १० मंडळांमध्ये एकूण ८०६ मयत खातेदारांची यादी तयार झाली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
शिरूर-३५, रांजणगाव-६१, तळेगाव ढमढेरे-८५, कोरेगाव भिमा-५४, पाबळ-९३, टाकळी हाजी-९७, मलठण-११८, वडगाव रासाई-५४, न्हावरा-११६, निमोणे-९३.
या विशेष मोहिमेअंतर्गत जे खातेदार गावात राहत नाहीत, त्यांच्यासाठी “पब्लिक डेटा एंट्री (PDE)” प्रणालीद्वारे मोबाईलवरूनही वारस नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर, शिरूर तालुक्याचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या गावातील मयत खातेदारांची माहिती संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करून या ऐतिहासिक मोहिमेसाठी सहकार्य करावे.
“जिवंत सातबारा” ही केवळ एक प्रक्रिया नसून गावाच्या मालमत्ता व्यवस्थापनात पारदर्शकता आणि वारस हक्कांच्या अचूक नोंदीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे.”
बाळासाहेब म्हस्के - तहसिलदार शिरूर.