उद्या दिनांक १८ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने येणार आहेत दादा शिरूरचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद झालाय तो सुरू करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का ? पुन्हा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार आहात याबाबत वक्तव्य करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.
राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या भूमीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू स्व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. कारखान्याचा एक गळीत हंगाम झाला नाही दुसरा गळीत हंगाम होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत सत्तेतील नेते आमदार अशोक पवार यांच्यावर आरोप करत आहेत तर आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सर्वच वरिष्ठ नेते अशोक पवार हे अजित पवार गटात गेले नसल्याने त्याचा सूड म्हणून अजित पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी निधी देत नाही असे जाहीर सभेतून सांगत आहे.
सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष तुमचे राजकारण तुमच्यापाशी आम्हाला फक्त घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करावा हीच आमची प्रमुख मागणी आहे. दादा तुम्ही सत्तेमध्ये आहात राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री आहात. कोणी कारखान्यात काय केले हे तुम्हाला माहिती आहे. त्याची चौकशी होऊ द्या.तुमचे राजकारण सोडून द्या आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासन लावा आणि साखर धंद्यातील एखादा तज्ञ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करावा अशी ही मागणी शेतकऱ्यांमधून आहे.
शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनु आहे. तालुक्याचे नाक म्हणून याकडे पाहिले जाते. अजितदादा पवार या कारखान्याकडे आपलेही कायम लक्ष होते आपणही कारखान्याला मोठी मदत केली आहे. आता घोडगंगा सहकारी साखर अडचणीत आला आहे. त्याला उभारी देण्यासाठी तुमच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यांनी मदतीचा हात देणे हे तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
अशी परिस्थिती असताना उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन सन्मान यात्रेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे हे मात्र नक्की खरे!